वृद्धांना फक्त शारीरिक आजार आणि थकलेले शरीर याच समस्या नसतात तर नैराश्य या मानसिक त्रासाला देखील त्यांना सामोरे जावे लागते. नैराश्याचा परिणाम शरीरावर झाल्याने अनेक आजार गंभीर रूप धारण करतात आणि ते बरे होणे अवघड होऊन जाते. त्याचबरोबर या व्यस्त जीवनशैलीत कामाच्या व्यापामुळे तरुणांना देखील त्यांच्याकडे पुरेसे लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना दुर्लक्षित, परवलंबी वाटते. परिणामी स्वाभिमान दुखावला जातो व मानसिक खच्चीकरण होते.
इतर तरुण मंडळींपेक्षा वृद्धांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. त्यांना भावनिक आधार दिल्याने त्यांच्यातील एकटेपणा, हतबलता, उदासीनता यांसारख्या नकारात्मक भावनांवर मात करता येते. Portea Medical चे मेडिकल डिरेक्टर Dr M Udaya Kumar Maiya, यांनी वृद्धांना नैराश्यावर मत करण्यासाठी फायदेशीर ठरतील अशा त्यांच्या महत्त्वाच्या १० भावनिक गरजा सांगितल्या.
सुरक्षितता: वाढत्या वयाबरोबरच अनेकांना सुरक्षिततेची चिंता सतावत असते. म्हणून वडीलधाऱ्या मंडळींना शारीरिक व मानसिक सुरक्षिततेची गरज असते. घरातील वातावरण त्यांना सुरक्षितता देणारे असेल तर ते आनंदी असतात.
लक्ष देणे: लहान मुलांप्रमाणे जेष्ठांना देखील त्यांच्याकडे सारखे लक्ष द्यावे असे वाटत असते. कारण बाहेरच्या जगाशी त्यांचा अधिक संबंध येत नाही. त्यांच्याकडे लक्ष दिल्याने आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आहे असे त्यांना वाटते. व ही भावना त्यांच्यासाठी सुखद असते.
काही गोष्टी मनाप्रमाणे करण्याचे स्वातंत्र: तुम्ही त्यांच्याकडे कितीही लक्ष दिले तरी बऱ्याच जेष्ठ लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे जगायचे असते. म्हणून जे काम ते स्वतः करू शकतात, ते त्यांना करू देणे महत्त्वाचे आहे. दैनंदिन जीवनातील सहज सोप्या गोष्टी त्यांना करू द्या. त्यामुळे त्यांचे सगळ्यावर नियंत्रण आहे अशी भावना त्यांच्यात जागृत होते व त्यातूनच त्यांना आनंद मिळतो.
भावनिक बंध: त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला की ते सगळे भावनिक बंध लगेच तोडून टाकतात. म्हणून काळजी घेण्यासाठी, आपुलकी दाखवून ते भावनिक बंध कायम टिकवण्यासाठी तुम्ही स्वतःहून पुढाकार घ्या.
अपराधीपणाची भावना दूर करा: आपल्या मुलांसोबत राहणाऱ्या जेष्ठ लोकांच्या मनात आपण मुलांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहोत ही भावना असते. तसंच मुलांच्या मनात आपण त्यांची पुरेशी काळजी घेऊ शकत नाही हा अपराधभाव असतो. जर असं काही असेल तर एकमेकांशी संवाद साधा. वाढीलधाऱ्यांच्या भावना चुकीच्या असल्याची जाणीव त्यांना करून द्या आणि त्यांना गरज असेपर्यंत तुम्ही त्यांच्या सोबत आहात हा विश्वास त्यांना द्या.
आपलेपणाची भावना: जे जेष्ठ लोक कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारासोबत बांधलेले असतात ते इतर वृद्धांच्या तुलनेत म्हणजे ज्यांना अशा प्रकारचा आधार नसतो त्यांच्यापेक्षा अधिक आनंदी आणि समाधानी असतात. कुटुंब आणि मित्रांशी असलेल्या बंधनामुळे त्यांना आपलेपणाची भावना आणि आनंद मिळतो. तसंच समवयस्क मंडळींसोबत विचारांची देवाणघेवाण होते. म्हणून अशा एकट्या असलेल्या जेष्ठांना मायेचा हात पुढे करा.
मैत्री: टिनएजर्स आणि तरुण लोकांप्रमाणे आनंददायी जीवनासाठी वृद्धांना देखील मैत्रीची गरज असते. म्हणून वृद्धांना देखील नवी मैत्री करण्याची संधी द्या.
एकांत: इतर तरुण लोकांप्रमाणे वृद्धांना देखील त्यांच्या आयुष्यात एकांत हवा असतो. म्हणून त्यांच्या या भावनेचा आदर करा. त्यासाठी साजेसं वातावरण तयार करा. काही वेळेला एखाद्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्यांना त्यांचा असा वेळ हवा असतो.
पात्रतेची जाणीव: वाढत्या वयानुसार आपली पात्रता कमी झाल्याची भावना अनेक वृद्ध व्यक्तींमध्ये असते. परंतु, हे भावना चुकीची असल्याची जाणीव त्यांना करून द्या आणि मग त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा.
जीवनाचा उद्देश: आयुष्यात आता काही राहिले नाही, असा त्यांचा समज असतो. काही वेळा तर जीवन जगण्याची इच्छा संपलेली असते तर कधी आयुष्यावरचा विश्वास उडालेला असतो. परंतु, हा समज चुकीचा आहे. त्यांच्या या एकटेपणाच्या भावनेकडे, डिप्रेशनच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष द्या. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काहीतरी उद्देश असतो. असा नवा, सकारात्मक विचार त्यांना द्या.
नैराश्यावर मात करण्यासाठी:
होम हेल्थकेयर हा नवा विचार भारतात रुजत आहे. वृद्धांचे आयुष्य सुधारणे हा यामागचा उद्देश आहे. नैराश्य आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या, वाढते वय या सगळ्याचा विचार करून त्यांचे काळजीपूर्वक मूल्यमापन होईल.
लक्षणांचे निदान न झाल्याने वृद्धांमध्ये डिप्रेशन वाढते. त्यांच्या गुंतागुंतीच्या विचारांमुळे समस्या अधिक गंभीर होते. खूप कमी लोकांना योग्य ते उपचार वेळीच मिळतात. याला अनेक कारणे आहेत. उदा. जागरूकता नसणे, कोणाचा आधार नसणे, भीतीमुळे आपल्या भावना, विचार इतरांना न सांगणे, इत्यादी. काही शारीरिक आजारांचे निदान व उपचार वेळीच होतात. परंतु, मानसिक आजाराचे काय? त्यांना सातत्याने प्रेम दिले, काळजी घेतली तर त्यांचे मानसिक दुःख कमी होण्यास आणि अधिक चांगले आयुष्य जगण्यास मदत होईल. नैराश्यावर नियंत्रण ठेवण्याची पहिली पायरी म्हणजे त्याचे निदान वेळीच होणे.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock