Read This in English
श्रावणात आणि विशेषतः उपवासाच्या दिवसांमध्ये कांदा-लसणाशिवाय जेवण बनवले जाते. चातुर्मासामध्ये कांदा टाळण्याचा सल्ला दिला जातो. एकीकडे कांदा-लसणामध्ये अनेक आरोग्यदायी आणि सौंदर्यवर्धक गुणधर्म असतानादेखील त्यांना टाळण्याचा सल्ला आयुर्वेदामध्ये का दिला जातो हे तुम्हांला ठाऊक आहे का ? मग नक्की जाणून घ्या Kairali Ayurvedic Centre आयुर्वैदीक स्पेशॅलिस्ट डॉ. राहूल डोग्रा यांचा खास सल्ला
आयुर्वेद आहाराकडे त्यातील गुण आणि चवीनुसार पाहते. पदार्थातील पोषणद्रव्यांनुसार सहा चवी असतात. यामध्ये गोड, आंबट, खारट, कडू, तुरट आणि तिखट पदार्थ चवीनुसार ओळखले जातात तर सात्त्विक, राजस आणि तामस हे पदार्थांचे गुणधर्म म्हणून ओळखले जातात.
कांदा आणि लसूण हे तामस आणि राजस पदार्थ आहेत. त्याला नैसर्गिकरित्या उग्र वास आहे. त्यामुळे शरीरातील पित्त आणि उष्णता वाढते. मानसिक शांततेसाठी ध्यान करणार्या व्यक्ती कांदा, लसूण टाळतात. कांदा, लसणामुळे राग, प्रकोपवृत्ती वाढते. आळस, मरगळ, कामवासना वाढल्याने मानसिक स्वास्थ्यदेखील बिघडते. राजसिक पदार्थांमुळे एकाग्रता कमी होते. मनाची चलबिचल वाढते. (नक्की वाचा : लसणामध्ये दडले आहेत 5 सौंदर्यवर्धक गुणधर्म )
आयुर्वेदानुसार कांदा आणि लसणामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. लसणामधील औषधी गुणधर्मामुळे ते राजसिक मानले जाते. लसणामुळे उष्णता आणि उर्जेस चालना मिळते. तर कांदा हा तामसिक मानला जातो. त्यांच्यामध्ये शरीरात थंडावा निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात कांदा प्रामुख्याने वापरला जातो. मसालेदार जेवणासोबत कांदा खाल्ल्याने पचनमार्गात थंडावा निर्माण केला जातो. उष्माघाताचा त्रास दूर करण्यासाठी ‘कांदा’ ठरतो फायदेशीर !
कांदा आणि लसणामधील औषधी गुणधर्मामुळे त्याचा वापर आयुर्वेदामध्ये जेवणातील पदार्थापेक्षा औषध म्हणून अधिक केला जातो. पित्त प्रकृतीच्या लोकांच्या आहारात कांदा,लसूण टाळण्याचा सल्ला दिला जातो. आहारात कोणतीही गोष्ट थेट टाळण्याऐवजी तुमच्या प्रकृतीनुसार पदार्थांमधील चव आणि गुण यांच्यानुसार त्याचे प्रमाण किती असावे याकडे लक्ष द्यावे. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी 10 आयुर्वेदिक टिप्स नक्की पाळा.