रश्मी कुमार मेहरा हिने स्वत:ची ‘Smile With Rashmi’ या फेसबूक पेजवर एक नवी ओळख निर्माण केली आहे.तिच्या स्मितहास्यावरुन ती कर्करोगग्रस्त होती यावर तुमचा विश्वास देखील बसणार नाही.पण कॅन्सर या दुर्धर विकारामुळेच आज तिच्यामध्ये हा आमुलाग्र बदल झाला आहे.ती दोन मुलांची आई तर आहेच पण आज ती एक सर्टिफाइड लाईफ कोच व मोटिवेशनल स्पिकर देखील आहे.
मात्र तिची एक वर्षापूर्वीची कहाणी मात्र फारच निराळी होती.तिने कोटक,बिर्ला,रिलायन्स सारख्या आघाडीच्या वित्तीय संस्थासोबत काम केले आहे.प्रत्येकालाच वर्क-लाइफ बॅलन्स सांभाळताना जीवन संघर्ष हा करावाच लागतो.
१ जानेवारी २०२६ ला सर्वांप्रमाणेच तिने देखील येणारे वर्ष आनंदाचे जावे यासाठी प्रार्थना केली होती.पण तिच्या आयुष्यामध्ये आनंद येण्यापूर्वीच काही समस्यांनी डोके वर काढले.तिला अनियमित मासिक पाळी,जेवणानंतर जडपणा,कामानंतर संध्याकाळी प्रचंड पाठदुखी या आरोग्य समस्या जाणवू लागल्या.तिचे शरीर या आरोग्य समस्यांमधून संकेत देत असूनही बरेच दिवस तिने याकडे दुर्लक्ष केले.डॉक्टरांकडे गेल्यावर तिच्या गायनेकॉलॉजिस्ट सुधा मारवाह यांनी तिला हॉर्मोनल गोळ्या देऊन एक ते दोन दिवसांमध्ये तिला बरे वाटू लागेल व मासिक पाळी देखील सुरळीत होईल असे सांगितले.पण पाठदुखीमुळे रश्मीला सोनोग्राफी करावी असे वाटू लागले.रिपोर्ट येईपर्यंत तिने मेडीटेशन करण्यास सुरुवात केली.तिच्यामते ध्यानातून तिला आत्मशक्ती व सामर्थ्य मिळाले ज्याचा तिला फायदाच झाला.आलेल्या रिपोर्ट नूसार तिच्या अंडाशयामध्ये काहीतरी बिघाड होता ज्याचे पुढील परिक्षण करणे आवश्यक होते.पुढे केलेल्या चेस्ट एक्स-रे, ब्लड टेस्ट व एमआरआयच्या परिक्षणावरुन तिला गर्भाशयाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले.डॉक्टरांनी तिला तिचे संपूर्ण अंडाशय व त्या आजूबाजूचे अवयव काढून टाकण्याचा सल्ला दिला ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये Complete Hysterectomy असे म्हणतात.त्रायदायक व भितीदायक असले तरी तिला या समस्येला तोंड देणे भाग होते.यासाठी वाचा ओव्हेरियन कॅन्सरची (अंडाशयाचा कर्करोग) लक्षणं !
कर्करोगाकडे पहाण्याचा दृष्टीकोन-
या समस्येमुळे भावनांचा कल्लोळ होणे सहाजिक होते पण तिने तिच्या भावनिक स्थितीवर नियंत्रण मिळवले.स्वत:ला मलाच का?असे विचारण्याऐवजी ती आता पुढे काय करायचे? असे विचारु लागली.त्यामुळे तिच्या विचारांमध्ये स्पष्टता आली.एका चांगल्या Oncologist च्या सहाय्याने ती तिच्या भविष्याचे नियोजन करु लागली.उपाचार दरम्यान व उपचारानंतर काय करायचे व याबाबत कुटूंब व मुलांसोबत कसा संवाद साधायचा याबाबत ती धैर्याने विचार करु लागली.परिस्थितीनूसार आवश्यक असलेल्या विचारांकडेच लक्ष केंद्रित केल्यामुळे तिच्या मनातील भिती कमी झाली.जाणून घ्या चाळीशीच्या टप्प्यावर या 6 कॅन्सर स्क्रिनिंग टेस्ट का कराव्या?
अर्थातच ती या लढाईमध्ये एकटी नव्हती तिच्या पतीची देखील तिला खंबीर साथ होती.त्यामुळे त्या दोघांनी देखील या समस्येकडे सकारात्मक दृष्टीने पहाण्याचे ठरविले.या कर्करोगाचे निदान झाल्यावर पाच ते सहा दिवसामध्ये त्यांनी Oncologist ची भेट घेतली.याबाबत रश्मी सांगते की,”मी माझ्या डॉक्टरांवर पुर्ण विश्वास ठेवला व कारण मी सुरक्षित हातात आहे हे मला माहित होते.१९ जानेवारी २०१६ ला माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.सर्व काही सुरळीत होण्यासाठी ही गोष्ट मुलांना सांगण्याचे आम्ही ठरविले.”
त्यांनी त्यांच्या मुलाला युवराज सिंग याचे ‘The Test of My Life: From Cricket to Cancer’ हे पुस्तक वाचण्यास दिले.कारण त्याला क्रिकेट आवडत होते व तो युवराज सिंगचा चाहता होता.मुलाने ते पुस्तक वाचवल्यावर त्यांनी त्याला तुझ्या आईला देखील कॅन्सर झालाय व तिच्यावर उपचार सुरु आहेत हे सांगितले.तिच्या मुलाने तिला तिने सुद्धा परदेशी जाऊन उपचार करावेत असा सल्ला दिला.त्यावर रश्मीने त्याला तिचा कॅन्सर निराळा अाहे व मला तुझ्यासोबत व तुझ्या लहान बहिणीसोबत राहायचे आहे असे सांगितले.पण ही गोष्ट तिच्या मुलाला पटली नाही.Mayo Clinic मध्ये पाठवण्यात आलेले रिपोर्ट जेव्हा तिने मुलाला दाखविले तेव्हा तो शांत झाला व त्याने आईला तु नक्की बरी होशील ना? असे विचारले.त्यावर तिने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.त्यानंतर तिच्या मुलाने तिला या संपूर्ण प्रवासामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त अगदी मोठ्या माणसांसारखा आधार दिला.तिची मुलगी ही गोष्ट समजून घेण्यासाठी फारच लहान असल्यामुळे तिने तिला बरे वाटत नसून मला उपचार करावे लागतील ऐवढेच सांगितले.रश्मीच्या मते तिची मुलगी देखील या काळामध्ये तिच्या वयापेक्षा जास्तच चांगली वागली.
आजारपणातील संघर्ष-
कर्करोगावरील उपचार हे साधेसोपे नसतात.यासाठी शस्त्रक्रिया,केमोथेरपी व इतर सर्पोटिव्ह उपचार करावे लागतात.१८ जानेवारी २०१६ ला रश्मीवर शस्त्रक्रिया करण्यात आली.ज्या शस्त्रक्रियेसाठी आठ ते नऊ तास लागले.तसेच तिला यासाठी दहा दिवस हॉस्पिटल मध्ये रहावे लागले.तिच्यासाठी शस्त्रक्रियेपेक्षा हॉस्पिटलमध्ये रहाणे फार त्रासदायक होते कारण ती आत्तापर्यंत तिच्या मुलांपासून दूर कधीच राहिली नव्हती.त्यामुळे तिला लवकर बरे होऊन मुलांजवळ जायचे होते.शुद्धीवर आल्यावर तिच्या लक्षात आले की तिच्या शरीराला तीन ट्यूब जोडल्या आहे ज्यावर सतत निरिक्षण ठेवणे आवश्यक आहे.त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर तिला प्रचंड अस्वस्थ वाटू लागले.तिने तिचा चाळीसावा वाढदिवस देखील आयसीयु मध्ये साजरा केला.
शस्त्रक्रियेनंतर एका महिन्यांने तिला केमोथेरपी देण्यास सुरुवात करण्यात आली.२१ दिवसांमध्ये सहा केमो सेशन घेण्याचा तिला सल्ला देण्यात आला.तिच्या Oncologist ने तिला केमोथेरपीचे साईड इफेक्ट्स व त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास कशी मदत होईल हे समजावले.हा सल्ला तंतोतंत पाळल्यामुळेच कदाचित तिला केमोथेरपीचे कमी दुष्परिणाम भोगावे लागले.केसगळती हा केमोथेरपीचा एक साईड इफेक्ट्स असतो आणि याबाबत रश्मीने व्यवस्थित काळजी घेतली.केमोथेरपीच्या दुस-या सेशननंतर रश्मीचे तिचे केस काढून टाकण्यात आले.त्यानंतर ती तिच्या एका मित्राने तिच्याच केसांपासून तयार करुन दिलेले विग घालू लागली तसेच त्यावर रंगीत स्कार्फ देखील घेऊ लागली.कॅन्सरवरील उपचारादरम्यान वजन का कमी होते ?हे जरुर वाचा.
केमोथरपीमुळे केसगळतीसोबत प्रंचड अशक्तपणा देखील येतो.ती तिचे केमोथेरपी सायकल गुरुवारी घेत असे ज्यामुळे शुक्रवारी देण्यात येणा-या इनजेक्टेबल डोसमुळे होणा-या अशक्तपणासाठी ती विक एन्डला विश्रांती घेऊ शकत असे व पुन्हा सोमवारी पुर्ववत होत असे.या रुटीनमुळे तिच्या कुटूंबियांना विकडेज मध्ये वेळ काढावा लागत नसे.पाचव्या केमोथेरपी सायकल नंतर तिच्या डाव्या हातावरचे नियंत्रण कमी झाले व पायातून देखील वेदना होऊ लागल्या.याबाबत डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की हे न्युरोपॅथी आहे व केमोथेरपीच्या औषधांमुळे हात व पायावर दुष्परिणाम होत आहेत.मात्र असे असले तरी हा त्रास नंतर कमी होईल असे तिच्या डॉक्टरांनी तिला सांगितले.यासाठी जाणून घ्या केमोथेरपीनंतर होणारे दुष्पपरिणाम टाळण्यासाठी असा असावा तुमचा आहार !
तिचे कुटूंब हे तिचे जग आहे.
तिला या संघर्षाला एकटीने तोंड द्यावे लागले नाही.तिचे पती व तिच्या मुलांसोबत तिचे सासु-सासरे देखील पाच महिने दिल्लीवरुन मुंबईला आले.तिची आई व तिची सासू या दोघींनी तिची या काळात काळजी घेतली.अर्थातच तिच्या आईसाठी तिचे आजारपण सहन करणे ही साधी गोष्ट नव्हती पण रश्मीची इच्छाशक्ती पाहून तिला देखील बळ आले.तिचे वडील जे तिच्यासाठी प्रेरणास्थान आहेत त्यांनी देखील तिला यासाठी प्रोत्साहित केले.आयुष्यभर त्यांनी तिला जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पहाण्यास शिकविले ज्याचा तिला या कठीण काळात चांगला फायदा झाला.तिची बहीण तिच्या सहा वर्षांच्या मुलीला एकटी ठेऊन रश्मीच्या केमोसेशन साठी तिच्या सोबत येत असे.घरी असताना तिची मुले देखील तिची सतत काळजी घेत असत.कुटूंबाच्या या प्रेमामुळेच ती लवकर बरी झाली.अनेक नातेवाईकांनी तिला या काळात मदत करण्यासाठी,तिच्या मुलांना सांभाळण्यासाठी तयारी दाखविली.पण तिने त्यांना त्रास होऊ नये यासाठी याबाबत नकार दिला.मात्र तिने नातेवाईकांना टाळले नाही तिच्या आरोग्याबाबत त्यांनी तिला विचारलेल्या प्रश्नांची तिने धैर्याने उत्तरे दिली.जेव्हा जेव्हा आव्हानात्मक परिस्थिती समोर आली तेव्हा तेव्हा तिच्या मुलांनी देखील त्या परिस्थितीला धैर्याने तोंड दिले.तिला मदत करणा-या व तिच्यासाठी पाच महिने सूप बनवून आणणा-या तिच्या मित्रमैत्रिणींची देखील ती यासाठी कृतज्ञ आहे.यासाठी वाचा आहाराची ही ’6′ पथ्यपाणी सांभाळल्यास कमी होईल कॅन्सरचा धोका !
पुढचा प्रवास-
रिकव्हरी साठी मजबूत डेडीकेशन ची गरज होती.सकारात्मक दृष्टीकोन,योग्य आहार व व्यायामाचा तिला पुर्ववत होण्यास फायदा झाला.केमोथेरपीचा न्यूरोपॅथी इफेक्ट्स घालविण्यासाठी ती योगा व फिजीकल ट्रेनिंग करु लागली.सुरुवातील १०० मीटर धावणे देखील कठीण होते.पण तिने जिद्द सोडली नाही.तिचे कुटूंबिय व तिची मुले यांनी देखील तिला प्रोत्साहन दिले.त्यानंतर तिने तिच्या बहिणीसह नोव्हेंबर २०१६ च्या ५किमी Pinkathon मध्ये सहभाग घेतला.त्यासाठी ती २ ते ३ महिने धावली व त्यानंतर मात्र तिला मागे वळून पहावे लागले नाही.कारण त्यानंतर ती ५ किमीच्या तीन मॅराथॉन व १० किमीच्या ठाणे मॅराथॉन मध्ये धावली.
कधीकधी आयुष्य तुम्हाला शिकवतच नाही तर असे अनुभव देते जे इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात.आजारापणातून बरे झाल्यावर डॉक्टरांनी तिला तिचा अनुभव काही कॅन्सरग्रस्त रुग्णांना सांगण्यास सांगितला.तिने तिचा अनुभव त्यांना सांगितला व त्यांना उपचार करण्यासाठी प्रेरित केले.या आजारामुळे आयुष्य संपेल अशी भिती वाटणा-या अनेकांना आज ती तिच्या अनुभवातून प्रेरणा देत आहे.आता कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करणे व प्रोत्साहित करणे हेच तिच्या जीवनाचे ध्येय झाले आहे.यासाठी तिने मोटिवेशनल स्पिकर व लाईफ कोचचा प्रोफेशनल कोर्स देखील केला आहे.या माध्यमातून रश्मी अनेक कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारांसाठी प्रेरीत करुन आशेचा किरण दाखवत आहे.याचसोबत ब्रेस्ट कॅन्सरवर मात करून अनेकींना प्रेरणा देणार्या उज्ज्वला राजेंचा कणखर प्रवास !देखील अवश्य वाचा.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock